पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) - पुणे जिल्ह्यात आज ३९१ लसीकरण केंद्रांवर एकूण ५५ हजार ५३९ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. असे असले तरी लसींचा साठा संपल्यामुळे हजारो नागरिकांना परत जावे लागले. ही अत्यंत निराशाजनक बाब असल्याचे सांगत केंद्र सरकारने तातडीने लसींचा पुरेसा साठा उपलब्ध लरून द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सुळे यांनी ही मागणी केली आहे. लसच उपलब्ध नसल्यामुळे पुणे जिल्ह्यातील १०९ लसीकरण केंद्रे आज बंद करावी लागली आहेत. लसीच्या पुरेशा साठ्याअभावी संबंधीत केंद्रांवरील डॉक्टर्स आणि एकूणच आरोग्य यंत्रणा हतबल आहेत. हे निराशावादी चित्र बदलण्यासाठी तातडीने प्रयत्न होण्याची गरज आहे.
कोरोना साथीच्या संसर्गाची साखळी तुटून सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर येणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील आणि एकूणच महाराष्ट्रातील तसेच देशभरातील जनजीवन निर्धोकपणे आणि सुरळीत चालू होणे गरजेचे आहे. त्याशिवाय नागरिकांना त्यांच्या पायावर उभे राहणे शक्य होणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याचा दृढनिश्चय आपल्याला करावा लागेल. त्यासाठी आपण लवकरात लवकर पुरेसा लस साठा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी डॉ. हर्षवर्धन यांना केली आहे.
No comments:
Post a Comment